Ajay Kandewar,Wani:- वणी शहरात “नमो उद्यान” या एकाच ठिकाणाचे तब्बल तीन वेळा उद्घाटन झाल्याची अभूतपूर्व घटना समोर आली असून, शहराच्या राजकीय इतिहासात ही बाब अक्षरशः धक्का देणारी ठरली आहे. एका फलकावरून सुरू झालेला वाद आता प्रतिष्ठेच्या लढाईत परिवर्तित झाला आहे. पहिल्या उद्घाटनावेळी नगराध्यक्ष विद्या आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा फोटो प्रमुख ठिकाणी झळकला. मात्र, प्रोटोकॉल न पाळल्याचा आरोप करत विद्यमान आमदार संजय देरकर यांनी संताप व्यक्त केला आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसह दुसऱ्यांदा नव्या फलकाचे उद्घाटन करून राजकीय तापमान चांगलेच वाढवले.
वाद इथेच थांबला नाही… तिसऱ्यांदा पुन्हा त्याच “नमो उद्यानाचे” उद्घाटन नगराध्यक्ष विद्या आत्राम यांच्या हस्ते, ढोल-ताशांच्या गजरात, बँडबाज्यासह मोठ्या थाटामाटात करण्यात आले. भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या तिसऱ्या उद्घाटनाने शहरात चर्चांचा धुरळा उडाला आहे. एकाच प्रकल्पासाठी तीन वेळा उद्घाटन होणे म्हणजे केवळ कार्यक्रम नव्हे, तर सत्तासंघर्षाची उघड झलक असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे वणीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, “दम कोणाचा?” हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. विद्यमान आमदार संजय देरकर यांचा प्रभाव अजूनही तितकाच आहे की माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा दबदबा पुन्हा वाढतोय? एकाच फलकाने पेटलेली ही लढाई आता थेट प्रतिष्ठेच्या युद्धात बदलली असून, येणाऱ्या काळात याचे पडसाद अधिक तीव्र उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता विद्यमान आमदारांची प्रतिसाद ची लढाई की प्रोटोकॉल ची लढाई हे बघणे महत्त्वाचे आहे .

