Wani ,Ajay: तालुक्यातील नांदेपेरा तालुक्यातील नांदेपेरा गावातून वांजरी मजरा, वनोजादेवी, सेलू खुर्द, ढोल, मच्छिंद्रा आदी गावांकडे जाणाऱ्या मार्गावर सुरू असलेल्या अवजड ट्रक वाहतुकीमुळे ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या समस्येची दखल घेत शिवसेना (शिंदे गट) यवतमाळ जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून ग्रामस्थांना सोबत घेऊन नांदेपेरा येथे अवजड वाहतुकीविरोधात तब्बल पाच तासांचे ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. भरधाव ट्रकांमुळे अपघाताचा वाढता धोका, धूळ, ध्वनीप्रदूषण आणि रस्त्यांची झालेली मोठ्या प्रमाणावरील हानी याविरोधात ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदूरकर तसेच वणी वाहतूक शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक नरेश रणधीर आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांच्या सर्व समस्या व मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. विशेषतः नांदेपेरा गावातील अवजड वाहतूक तात्काळ बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी ठामपणे लावून धरली.
अखेर पोलिस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख अटी-शर्ती मान्य करत समस्येवर तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर जिल्हा संघटक विजयभाऊ चोरडिया यांच्या आवाहनानुसार ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तब्बल पाच तास चाललेले ‘चक्का जाम’ आंदोलन यशस्वी ठरल्याची भावना आंदोलनकर्ते व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या आंदोलनात राहुल मुंजेकर, शुभम गोरे,राहुल पारखी, रोहन पारखी, कपिल कुंटलवार, अमृत पुरी, राजू खामणकर, गणेश लांडगे, प्रज्योत ठावरी, निलेश हेपट यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

