अजय कंडेवार,Wani:- ब्रिटिशकाळात निर्मित वणी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अनेक वर्षांपासून “खंडर” बनली आहे.येथील वणी ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचारी सुद्धा भाड्याच्या घरात राहून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, पोलिसांच्या मालकीची जागेत अद्यापही मंजूर झालेल्या बांधकामाच्या प्रतीक्षेतच आहे. वणी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची निवासस्थाच्या बाबतीत दूरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने पोलिसांच्या सदनिकेची डागडुजी तर सोडा कुणी हूंगूनहीं पाहणी केलेली नाही. सदनिकांवरील कवेलू फुटले आहेत. पावसाळ्यात छप्परावर ताडपत्री टाकून पाण्यापासून बचाव करावे लागतात. नाल्या तुंबणे,अक्षरशः पोलिसांना झाडाझुडपात राहावा लागत आहे अशी बिकट परिस्थिती या पोलिसांवर आज ओढावली आहेत. तरीही कोणीही मोठा अधिकारी असो की राजकिय नेता असो यांच्या समस्येकडे कोणीही लक्ष देण्यास वेळ नाही. यांचे निवासस्थानातील भिंतीचे प्लास्टर खराब,घराचे दरवाजेसुद्धा पूर्णपणे बंद होत नाहीत.यासह अनेक समस्या कायम आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची स्थिती त्याहीपेक्षा बिकट झालेली आहे. तसेच वणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काहीं भाग अतिसंवेदनशील आहे. येथे अनुचित प्रकार घडल्यास पोलीसांना तत्काळ बंदोबस्तासाठी जावे लागते. मात्र, अनेक पोलीस कर्मचारी शहरातील विविध भागात भाड्याने राहत असल्यामुळे त्यांना तैनात होण्यास उशीर देखील होतो.
•नव्या घराची प्रतीक्षा आणखी किती दिवस…..
वणी ठाण्यातील 1 पीआय, 2 एपीआय, 4 पीएसआय,37 पोलीस कर्मचारी आहेत. गृहविभागाने वणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांसाठी मंजूर झालेली नवीन घरे तात्काळ निर्माण करावी, अशी मागणी पोलीस कर्मचारी वर्तुळातून होत आहे.
•भाड्यापोटी लाखोंचा खर्च
वणी पोलीस ठाण्याच्या आवारातील पोलीस निवासस्थान तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्यासाठी निवासस्थाने निर्माण होणे गरजेचे आहे. वणी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होऊन जवळपास अनेक वर्षे झाले आहेत. तेव्हापासून आजपर्यंत उपविभागीय पोलीस अधिकारीसुद्धा भाड्याच्या घरात राहत आहेत. या भाड्यापोटी शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत.
•इमारत बांधण्यासाठी शासनाला पाठविलेला प्रस्ताव मंजूर,मात्र अद्यापही लालफितीत अडकलेला…
” पोलिस वसाहतीत एकेकाळी अधिकारी आणि कर्मचारी कुटुंबांसह राहत असत. त्या जुन्या इमारती आता धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत. तुटलेली दारे-खिडक्या, भेगा पडलेल्या भिंती, स्लॅब कोसळण्याचा धोका, गळती आणि चाळींमध्ये वाढलेले गवत यामुळे सापांपासून धोका निर्माण झाला आहे. पोलिस ठाण्याची इमारतही फारच जीर्ण असून पावसाळ्यात छत गळते, कौलारू छप्पर धोकादायक आहे, तर शौचालये इतकी अरुंद आहेत की वापरणे कठीण झाले आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नवीन वसाहत आणि पोलिस स्थानक बांधण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, तब्बल ३ वर्षांचा कालावधी उलटूनही प्रस्ताव पास झाला मात्र अद्यापही लालफितीत अडकलेला आहे. परिणामी, पोलिसांचे कुटुंबीय असुरक्षित वातावरणात राहत असून पोलिसांना देखील मनःशांतीने सेवा बजावता येत नाही.”

