Ajay Kandewar,Wani :- शहरात सत्तेच्या माजाने सार्वजनिक सुविधेचा कसा बळी घेतला जातो, याचे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. एका तथाकथित पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या प्रतिष्ठानसमोर असलेली सार्वजनिक ट्यूबवेल व टँकर भरण्याची सुविधा ‘अडथळा’ ठरत असल्याने ती मुद्दाम कायमस्वरूपी बंद करण्याचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप परिसरातील संतप्त नागरिकांनी केला आहे.वणी शहरात टागोर चौकात अचानक जाम झालेल्या सार्वजनिक ट्यूबवेल प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.
या ट्यूबवेलच्या अगदी समोर एका व्यापारी प्रतिष्ठानाचा संबंध येत असल्याने नागरिकांच्या नजरा आता तिकडे वळल्या आहेत. संबंधित व्यापारी हा एका पक्षाचा पदाधिकारी असून तो माजी नगरसेवक म्हणूनही कार्यरत राहिलेला आहे, ही बाब शहरात सर्वश्रुत आहे. त्यामुळे “सार्वजनिक सुविधा अचानक गायब होणे आणि याच जागी खासगी पाण्याच्या हालचाली दिसणे” हा निव्वळ योगायोग आहे का, असा सवाल वणीभर विचारला जात आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, नगरपरिषदेचे लाखो रुपये खर्च करून उभारलेली सुविधा काही तासांत निकामी कशी झाली, यात “तो गब्बर व्यापारी आणि खाऊ करणारे यांच्या संगनमताने ” झाले असावे.याचे उत्तर अद्याप कुठल्याही अधिकृत यंत्रणेकडून दिलेले नाही. कुठलीही तक्रार, कुठलाही पंचनामा, कुठलीही माहिती जाहीर न होता हे सर्व घडले कसे, यामुळे संशय अधिक गडद होत आहे. शहरात आता उघडपणे चर्चा सुरू आहे की, सामान्य नागरिकांसाठी असलेले पाणी ‘अडथळा’ ठरत असेल, तर त्याची किंमत वणीनेच का मोजायची? या प्रकरणामुळे संबंधित व्यापारी-पदाधिकाऱ्याबाबत वणी शहरात तीव्र नाराजी पसरली असून, “सत्ता, व्यापार आणि सार्वजनिक सुविधा यांचा असा मेळ योग्य आहे का?” असा प्रश्न चहाच्या टपरीपासून चौकाचौकात चर्चिला जात आहे. चौकशी झालीच तर अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, अशीही कुजबुज सुरू आहे.

