Ajay Kandewar,Wani :-विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि यशाचा गौरव करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.ऑगस्ट २०२५ ते मे २०२६ या दहा महिन्यांच्या कालावधीत पीएसआय, एसटीआय, पोलीस भरती, तलाठी, आरोग्य विभाग, महावितरण, आर्मी, CRPF, CISF आदी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय खाडे होते, तर उद्घाटन आमदार संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य प्रसाद खानझोडे, प्रतिक्षा गुरनुले. खुलसंगे, इजहार शेख तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
युवा चेतना क्लब प्रा. दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र गेल्या ११ वर्षांपासून वैभव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा परीक्षांचे प्रभावी मार्गदर्शन करत आहे. या दोन्ही संस्थांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत संधी मिळत असल्याचे यावेळी मान्यवरांनी गौरवोद्गारांतून नमूद केले.प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी वैभव ठाकरे यांनी तयार केलेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये पदवी शिक्षणासोबत लागू करण्याचा मानस व्यक्त केला. भविष्यात हा अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावरही राबविण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आमदार संजय देरकर यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मिळवलेल्या यशाचे कौतुक करत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भेटवस्तू प्रदान केल्या. अध्यक्ष संजय खाडे यांनी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवत त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. प्रतिक्षा गुरनुले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत “वैभव ठाकरे हे वणीच्या शिक्षण क्षेत्रातील भूषण आहेत,” असे गौरवपूर्ण उद्गार काढले.

यावेळी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते प्रा. दिलीप मालेकर (संचालक, युवा चेतना क्लब), वैभव ठाकरे (संचालक, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र, वणी) तसेच उपसंचालक प्रदीप मोहरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, नागरिक आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.युवा चेतना क्लब आणि ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्राचा स्पर्धा परीक्षांमधील निकाल हा विदर्भातील सर्वोत्तम निकालांपैकी एक मानला जात असून, या यशामुळे वणीच्या शैक्षणिक क्षेत्राची प्रतिष्ठा अधिक उंचावली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश भगत यांनी केले, तर आभार प्रदर्शन शुभम राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रदीप मोहरे, रोशन भोयर, निखिल फुसे, विकास बांदुरकर, निखिल चिने, मयूर पेंदोर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

