Ajay Kandewar,Wani : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत ग्रामसखी व प्रभागस्तरीय कॅडर महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने बच्चू कडू यांच्या उपस्थितीत निवेदन सादर केले. ग्रामसखी व कॅडर महिला शासनाच्या विविध योजना, डिजिटल व्यवहार, लखपती दीदी अभियान, ऑनलाइन कामकाज, बँक व्यवहार, प्रशिक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वयाची जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या वाढत्या कामाच्या तुलनेत मानधन अपुरे असल्याचा मुद्दा निवेदनातून मांडण्यात आला. उमेद अभियान कायमस्वरूपी सुरू ठेवून ग्रामसखी व प्रभागस्तरीय कॅडरला कायमस्वरूपी करण्याची लेखी हमी, स्वतंत्र विभागाची निर्मिती, कमी करण्यात आलेले मानधन पूर्ववत करून वाढीव मानधन व NRLM मानधन देणे, अतिरिक्त कामाचा मोबदला, अनुभवी कॅडरला शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या आधारे नियुक्ती, अतिरिक्त कॅडरच्या जागी वंचित महिलांना संधी तसेच दिवाळीला आर्थिक मदत आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
उमेदच्या महिलांनी मांडलेल्या प्रश्नांची दखल बच्चू कडू यांनी गांभीर्याने घेतली असून, त्यांच्या मागण्या शासनस्तरावर मांडून प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्याने महिलांमध्ये नव्या ‘उमेद’ची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या या प्रश्नांकडे केवळ निवेदन म्हणून न पाहता त्यांची प्रत्यक्ष दखल घेत प्रश्न सोडविण्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतल्याने उमेदच्या ग्रामसखी व कॅडर महिलांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
यावेळी दिपा धानोरकर, कलावती मोहितकर, जयश्री उपरे, सुवर्णा चतुर, कविता ढेंगळे, नीलिमा काथवटे, अविनाश देवतळे, राहुल कुंडेकर, विलास ढवळे, नितीन बद्रे, अतुल मते, प्रीती झाडे, सुवर्णा इनामे, किरण, वैशाली धानोरकर व स्वीटी टोंगे उपस्थित होते.

