Ajay Kandewar,Wani:- वणी येथील ग्रामीण रुग्णालय हे आता उपचारांचे केंद्र न राहता केवळ ‘चंद्रपूर रेफर केंद्र’ बनले असल्याचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा, जबाबदारी टाळण्याची वृत्ती आणि ‘रेफर’ देण्याच्या सवयीमुळे गोरगरीब रुग्णांची अक्षरशः फरफट होत असल्याचे वास्तव उघड झाले आहे.

गरिबांनी कुठे जायचे…… बघा हा भोंगळ..
याचे जिवंत उदाहरण बुधवार ११फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 ते 1.00 दरम्यान पाहायला मिळाले.सुश्रुत मोहन गेडाम (वय 16), रा. झमकोला, ता. झरी, जि. यवतमाळ हा अल्पवयीन रुग्ण अपचनामुळे सतत हगवण व पोटदुखीचा त्रास होत असल्याने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला होता.रुग्णाला उपचारादरम्यान दोन सलाईन देण्यात आल्या. मात्र निवेदनात उल्लेख असलेल्या त्या वैद्यकीय अधिकारी डॉ. निशा रंधे यांनी “B .P.Low आहे, वाढत नाही आणि योग्य औषधे व तज्ञ डॉक्टर नाहीत”असे सांगत थेट चंद्रपूर किंवा खासगी रुग्णालयात घेऊन जा असे उडवा-उडवीचे उत्तर दिले असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.एवढ्या साध्या आजारासाठीही जबाबदारी झटकत रुग्णाला रेफर करण्याचा प्रकार पाहून नातेवाईक अवाक् झाले.
त्यानंतर त्या रुग्णाला वणीतील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे अवघ्या दोन तासांच्या उपचारात रुग्णाला आराम मिळाला, मात्र या उपचारासाठी त्या गरीब कुटुंबाला 1200 रुपये खर्च करावे लागले. सरकारी रुग्णालयात जे उपचार होऊ शकले असते, त्यासाठी खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागणे ही गंभीर बाब आहे.जर हगवण, अपचन, ताप, पोटदुखी अशा छोट्या आजारांसाठीही चंद्रपूर रेफर दिला जाणार असेल, तर वणी ग्रामीण रुग्णालयाचा उपयोग काय? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत. त्यामुळे हे रुग्णालय बंद करून त्याला “चंद्रपूर रेफर केंद्र” असे नाव द्यावे, अशी उपरोधिक पण संतप्त मागणी जनतेतून होत आहे.एकीकडे ग्रामीण भागात रस्ते नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याच्या शोकांतिका घडत असताना, दुसरीकडे सर्व सुविधा असूनही आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र वणी ग्रामीण रुग्णालयात दिसून येत आहे. हे रुग्णालय आता केवळ मलमपट्टी, ताप-खोकला यापुरते मर्यादित राहिले असून इतर रुग्णांच्या हातात “रेफर टू चंद्रपूर”चे कागद देऊन बोळवण केली जात आहे..
शासन गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतानाही वणी ग्रामीण रुग्णालय फक्त नावालाच उरल्याचे चित्र आहे. सर्व उपकरणे व सुविधा उपलब्ध असताना “तज्ञ डॉक्टर नाहीत” हे कारण पुढे करून वैद्यकीय अधिकारी कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. उलट रुग्णांना घाबरवून, मानसिक दडपण टाकून रेफर करण्याचा सपाटा सुरू आहे.

