Ajay Kandewar,Wani:- वणी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वणी येथे झालेली संकल्प सभा प्रचंड उत्साहात पार पडली. शासकीय मैदानावर भरलेल्या या सभेला हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले. कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हेही विशेषतः उपस्थित होते.सभेमध्ये वणीच्या अनेक प्रमुख प्रश्नांवर उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी थेट भाष्य करत विकासाचा ठोस रोडमॅप जाहीर केला.
वणी परिसरात कोळशाच्या खाणी असल्या तरी शहरातून सतत धावणाऱ्या कोळसा ट्रकांमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून ज्येष्ठ नागरिकांसह अनेकांना श्वसनाचे आजार वाढल्याचे त्यांनी नमूद केले.“ एकही कोळशाचा ट्रक शहरात येणार नाही,” असा आश्वासक शब्द त्यांनी दिला.नगरपरिषदेच्या निधीचा काहींनी खुर्चीसमोर खाजगी मालमत्तेसारखा वापर केल्याचा आरोप करत,“निधी हा जनतेसाठी आहे, त्याचा अपहार झाला असेल तर चौकशी करून कारवाई करू,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.वणीतील अपघातग्रस्तांसाठी तातडीच्या उपचारांची कमतरता लक्षात घेऊन,“वणीमध्ये अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर सुरू करू,” ही महत्त्वाची घोषणा सभेत करण्यात आली.शहरातील गंभीर पाणीप्रश्न, दूषित पाणी आणि वाढते प्रदूषण या मुद्द्यांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.
“शिवसेनेच्या हाती सत्ता दिल्यास ‘दूषित पाणीमुक्त वणी, उत्तम रस्ते असलेले वणी’ उभारू,” अशी ठाम हमी त्यांनी दिली.वणी हे महिला सबलीकरणाचे शक्तिपीठ असल्याचे सांगत,“नगराध्यक्षपदासाठी तुमची लाडकी बहीण उभी आहे. लाडकी बहीण योजना बंद पडावी यासाठी अनेकांनी डाव रचले, पण योजना बंद पडणार नाही,” अशी ग्वाही शिंदे साहेबांनी दिली.विधानसभेतील महिलांच्या चमत्कारिक पाठिंब्याचा उल्लेख करत, “तोच चमत्कार नगरपरिषदेतही घडवावा,” असे आवाहन त्यांनी केले.
नगराध्यक्ष पदासाठी कु. पायल तोडसाम यांच्यासह २९ उमेदवारांची प्रचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली. सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचे जोरदार आवाहन यावेळी करण्यात आले.या सभेला जिल्हा संघटक विजय चोरडिया, जिल्हा संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार, महिला आघाडीच्या किरण विश्वास नांदेकर, उपजिल्हाप्रमुख उमेश वैरागडे, तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे, शिवसेना पदाधिकारी, उमेदवार व हजारो कार्यकर्ते आणि नागरिक उत्साहाने उपस्थित होते.
•प्रदूषण नियंत्रण महामंडळाला डायरेक्ट कॉल…..
वणीमधील प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना त्यांनी फोनवरून निर्देश दिले, त्यांनी २४ तासात यावर कारवाई करू असे सांगितले. त्यामुळे बघतो करतो नव्हे, तर तात्काळ अंमलबजावणी करणारी शिवसेना आहे असे सांगून त्यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.

