Wani:- देशाची राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध स्पर्धा परीक्षांतील हजारो विद्यार्थी न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. अनेक वर्षे रात्रंदिवस अभ्यास करूनही भ्रष्टाचार, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब आणि अपारदर्शक व्यवस्थेमुळे त्यांच्या हातात निराशाच येत आहे.
गुणवत्तेपेक्षा पैसा आणि ओळखीला अधिक महत्त्व दिले जात असल्याने मेहनती विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे. अनेक जण आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्षे तयारी करतात; मात्र भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारामुळे त्यांची स्वप्ने धुळीस मिळत आहेत.या परिस्थितीचा मानसिक परिणामही गंभीर होत असून, काही विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जात आहेत. विद्यार्थी संघटनांनी सरकारने भरती प्रक्रिया पारदर्शक करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्या अडकीलवार या विद्यार्थिनीने केली आहे.
देशाच्या भविष्यासाठी शिक्षण आणि गुणवत्ता यांना सर्वोच्च स्थान मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा योग्य सन्मान झाला, तरच देश सक्षम आणि प्रगत होईल. जंतर-मंतरवरील हे आंदोलन केवळ नोकरीसाठी नसून, प्रामाणिकपणा, समान संधी आणि न्यायासाठीचा लढा आहे.

