Ajay Kandewar, Wani :- वणी नगरपरिषद निवडणूक ही उबाठा गटासाठी केवळ निवडणूक नव्हती, तर नेतृत्व, संघटन आणि जबाबदारीची कसोटी होती. या कसोटीत एक बाजू स्पष्टपणे दिसली.आमदार संजय देरकर यांची सततची उपस्थिती, हालचाल आणि प्रयत्न. मात्र दुसरी बाजू तितकीच ठळकपणे जाणवली.पक्षाचे स्थानिक जिल्हाध्यक्ष,शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष यांची अल्प किंवा नगण्य भूमिका आणि त्यातही निव्वळ चर्चा जास्त अशी स्थिती होती.
निवडणूक काळात आमदार देरकर हे उमेदवारांसोबत, कार्यकर्त्यांमध्ये आणि प्रचारात सातत्याने दिसत होते. राजकीय निरीक्षकांच्या मते, त्यांची भूमिका ‘फ्रंटफुट’वर होती. पण याच वेळी पक्ष संघटनेचा कणा मानले जाणारे “ते तिन्ही “पदाधिकारी पार्श्वभूमीतच राहिले, अशी चर्चा शहरभर पसरली.राजकारणात आमदार हे लढाईचे नेतृत्व करतात, तर पदाधिकारी ही लढाई जिंकण्यासाठीची यंत्रणा असते. मात्र वणी नगरपरिषद निवडणुकीत नेतृत्व आणि यंत्रणा यांच्यातील तफावत प्रकर्षाने समोर आली. आमदारांची मेहनत दिसत होती, पण त्या मेहनतीला संघटनात्मक बळ मिळाले नाही, या चित्रातून स्पष्ट दिसले.वणी उबाठा शहराध्यक्षाकडून अपेक्षित असलेली शहरातील गटबांधणी, कार्यकर्त्यांचे मनोबल आणि समन्वय प्रभावीपणे दिसला नाही. तालुकाध्यक्षांकडून अपेक्षित असलेली तालुक्याची ताकद एकत्र करून शहरात आणण्याची भूमिका पुरेशी जाणवली नाही. तर जिल्हास्तरीय नेतृत्वाकडून अपेक्षित असलेली दिशा, मार्गदर्शन आणि नियंत्रण हेही अपुरेच राहिले, अशी चर्चा आहे.याच पार्श्वभूमीवर, उबाठा गटाला २५ टक्क्यांवर समाधान मानावे लागणे आणि ७५ टक्के अपयश पदरी पडणे, हा केवळ आकड्यांचा खेळ न राहता राजकीय व्यवस्थेतील विसंगतीचे प्रतिबिंब मानले जात आहे. विशेषता या स्पष्ट म्हटलं जात आहे की वणीतील तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि काम शून्य स्पष्ट नागरिकातून बोलले जात आहे “फक्त पद घ्या”अशा पद्धतीची भावना लोकांतून बोलल्या जात आहे.
आमदार विरुद्ध पदाधिकारी अशी थेट लढाई नसली, तरी कामाची तुलना आता टाळता येत नाही. एकीकडे प्रत्यक्ष मैदानात दिसणारी मेहनत, तर दुसरीकडे अपेक्षित असलेली पण न दिसणारी संघटनात्मक ताकद.याच दरीत उबाठा गट अडकला, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या निकालाने एक प्रश्न ठळक केला आहे.अपयशाची किंमत कोण मोजणार? मेहनत करणाऱ्यांना दोष दिला जाणार की जबाबदारी न पेलणाऱ्यांकडे पक्ष नेतृत्व लक्ष देणार? या प्रश्नांची उत्तरे येत्या काळात उबाठा गटाच्या वणीतील राजकारणाची दिशा ठरवतील, हे मात्र नक्की. वणी नगरपरिषद निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली राजकारणात मेहनत दिसली, पण संघटन हरवले.

