Ajay Kandewar,Wani:- वणी शहरातील नागरिकांना मागील काही दिवसांपासून अस्वच्छ, गढूळ आणि आरोग्याला अपायकारक पाणी मिळत असल्याने जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. काही भागात चार ते पाच दिवसांनी एकदाच नळाला पाणी येत असून, तेही पूर्णपणे दूषित असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या गंभीर समस्येविरोधात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी नगरपरिषदेचे लक्ष वेधत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, “पावसाळ्यानंतरही शहरातील नळयोजनेत शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. अनेक भागांतील रहिवाशांना आरोग्याचा धोका निर्माण झाला असून पालिका केवळ तक्रारींकडे दुर्लक्ष करत बसली आहे.”
शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. उलट नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्यासाठी खासगी प्युरिफायर केंद्रांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.मनसेने या समस्येकडे लक्ष वेधताना सांगितले की, शहरातील जलस्रोत पुरेसे असूनही नळयोजनेतील भ्रष्ट व्यवस्थापन आणि दुर्लक्षामुळे नागरिक तहानले आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल.शहरातील स्थानिक नागरिक संघटनांनीही मनसेच्या या भूमिकेला पूर्ण पाठिंबा दिला आहे. त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.

