•ज्या बापाने पक्ष दिला, त्याच बापाचा पक्ष चोरला- जिल्हाध्यक्ष नगराळे
•ही लोकशाहीची हत्या असा घणाघाती आरोप.
अजय कंडेवार,वणी:- ज्यांनी पक्षाची स्थापना केली, त्यांच्या विचारातून पक्षाची घटना तयार झाली, त्या संस्थापक अध्यक्षांच्या हातूनच पक्ष काढून घेण्याचे प्रताप निवडणूक आयोगाकडून होत आहे. या लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार आयोगाकडून होत असल्याने शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष सा.न्याय विभाग यवतमाळ विजय नगराळे याचा नेतृत्वात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी (ता.9 फेब्रु ) शुक्रवारी रोजी येथील छ.शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकित पुतळ्यासमोर निषेध करण्यात आले.

देशात विरोधी पक्षच राहू नये,अशी सत्तेतील महाशक्तीची इच्छा आहे. त्यातून एकतर विरोधी पक्षातील नेत्यांवर ईडी, इन्कम टॅक्स यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. नाही तर विरोधी पक्षातील काही नेत्यांना फोडून आपल्या गटात घेण्याचा पायंडा पाडला गेला आहे. सर्वात आधी शिवसेना पक्ष फोडण्यात आला. त्यानंतर आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षही फोडून तो पक्ष बंडखोर गटाला देण्यात आल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. वास्तविक राष्ट्रवादी पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली. पक्षाची घटना त्यांच्या संकल्पनेतून तयार झाली. मात्र, पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या गटालाच मान्यता देऊन पक्षातील सक्रिय सभासदांना किंमत न देता निवडणूक आयोगाने हा पक्ष अजित पवार गटाला दिला. एकंदरीत या मागे कुठल्यातरी अदृश्य शक्तीचा हात आहे. “ज्या बापाने पक्ष दिला, त्याच बापाचा पक्ष चोरला” जात असल्याचा आरोप शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जिल्हाध्यक्ष सा.न्याय विभाग यवतमाळ विजय नगराळे यांनी केला. लोकशाहीच्या या क्रूर थट्टेचा निषेधम… म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांसह घोषणाबाजीही केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष सा.न्याय विभाग यवतमाळ विजय नगराळे, खुशाल बासमवार ,विनोद ठेंगणे, गुणवंत टोगें, दिलीप गुंजेकर, अजय अनपुरे, कुणाल गड्डीवार, चेतन चौधरी, अन्वर शेख, ओम टोंगे, नितेश तावडे, नत्थु नैताम, निब्रड पाटील, सुमित देवगिरीकर,अनिल थुल, नरेंद्र नाखले , इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

