Ajay kandewar,Wani- तालुक्यातील पळसोनी गावात अनधिकृत कापूस बियाण्यांचा मोठा साठा पकडण्यात आल्याने कृषी विभागासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या तक्रारीवरून अरुण शंकर भट (वय ४५, रा. पळसोनी) याच्याविरुद्ध बियाणे अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला. ६ मे रोजी रात्री कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भट यांच्या घरावर धाड टाकली असता ,प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांच्या कापूस बियाण्यांचा तब्बल ८१ पाकिटांचा साठा आढळून आला. या साठ्याची किंमत सुमारे १ लाख १५ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
कारवाईदरम्यान “माऊली-5”, “सिल्वर 5G”, “कावेरी 5G”, “सुरक्षा”, “जंबो 5G”, “गॅलेक्सी हायपर”, “धूम-2” अशा विविध नावांनी विक्रीसाठी ठेवलेले संशयित बियाणे जप्त करण्यात आले. काही नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून लाखेने सीलबंद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पळसोनी गावातच हा अनधिकृत साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती पुढे येत असून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारा हा काळाबाजार असल्याची प्रतिक्रिया गावात व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार अविनाश चिकराम करीत असून पळसोनीतील अरुण भटच्या या कथित कारनाम्यामुळे कृषी विभाग सध्यातरी सतर्क झाला .
पळसोनीत कारवाई झाली खरी; मात्र….
पळसोनीत कारवाई झाली खरी; मात्र वणीतील मोठे ‘बियाणे माफिया’ अजूनही कृषी विभागाच्या रडारबाहेर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. छोट्या कारवायांचा गाजावाजा होत असताना मोठे मासे मात्र सुरक्षितच असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. आता कृषी विभाग खरंच मोठ्या साखळीपर्यंत पोहोचणार की केवळ थातूरमातूर कारवाई करून वेळ मारून नेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

