वणी : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना आणि बैठका होत असल्या, तरी वणी शहरातील अनेक शाळा वाहने अद्यापही सुरक्षा नियमांना हरताळ फासून धावत असल्याचे वास्तव समोर आले आहे. जुलै २०२५ मध्ये वाहतूक विभागाच्या बैठकीत फिटनेस, विमा, जीपीएस, सीसीटीव्ही, फर्स्ट-एड बॉक्स, फायर एक्सटिंग्विशर, केअरटेकर, चालकांचे चरित्र पडताळणी व वैद्यकीय तपासणीसह अनेक नियम बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने अनेक वाहनांमधून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू असल्याची बाब पुन्हा चर्चेत आली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन सादर करून वणीतील सर्व शालेय बसेस, व्हॅन आणि खासगी वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी केली आहे. सुरक्षा निकषांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर व संबंधित शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी, तसेच नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांची शालेय वाहतूक तात्काळ बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली.

