Ajay kandewar,Wani : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूसंच वाटपाची योजना सुरु आहे. सदर संचाचे वाटप केंद्र सध्या शेलू (बु.), ता. पुसद येथे कार्यरत असून, यामुळे वणी, झरी, मारेगाव तालुक्यातील सुमारे दहा हजारांहून अधिक नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गंभीर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

कामगारांना संच घेण्यासाठी सरासरी १५० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यासाठी १० तासांचा कालावधी खर्ची पडतो तर वाहतूक खर्चासाठी किमान पाच हजार रुपये मोजावे लागतात. यामुळे कामगारांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब स्थानिक स्तरावर तीव्रतेने मांडण्यात आली आहे.ही बाब लक्षात घेऊन जि.प.सदस्य विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी वणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत उपजिल्हा कार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी, यवतमाळ यांच्याकडे निवेदन सादर केले. यात कामगारांना संचाचे वाटप तालुका स्तरावरच करण्यात यावे, अशी न्याय्य व रास्त मागणी करण्यात आली आहे.यवतमाळ जिल्ह्याचे विस्तीर्ण क्षेत्र लक्षात घेता, संच वितरण केंद्रावर कामगारांना वारंवार ये-जा करणे अशक्यप्राय ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय वणी तालुक्यातील रासा, बोर्डा आणि इतर गावांतील कामगारांना २४ सप्टेंबर २०२५ रोजी संच वाटपाची तारीख दिली असून, एजंटांच्या माध्यमातून ‘निर्धारित दिवशी संच न घेतल्यास मंजूर संच रद्द होईल’ असा दबाव टाकला जात असल्याचेही कामगारांनी स्पष्ट केले. यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शासनाने आखलेल्या कल्याणकारी योजनेचा लाभ सर्व कामगारांना सुलभतेने मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने वणी, झरी व मारेगाव तालुक्यांतील कामगारांना थेट तालुका स्तरावर वस्तूसंच वाटप करण्याची तातडीची व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी माजी जि.प.सदस्य विजय पिदुरकर यांनी याप्रसंगी केली आहे.

