Ajay,Wani : मारेगाव-वणी महामार्गावरील गौराळा फाटा परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, अवघ्या मागील तीन दिवसांत तब्बल चार अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात युवकाचा हात खांद्यापासून तुटल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गौराळा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात हायवा वाहनांची वर्दळ असते. परिसरालगतच माईन्स असल्याने तेथून खनिज वाहतूक करणारे हायवा सातत्याने या मार्गावरून ये-जा करतात. याच अवजड वाहनांच्या वाढत्या वर्दळीमुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे, मागील तीन दिवसांत चार अपघात झाल्याची माहिती समोर येत असताना हायवांच्या वाहतुकीवर नियंत्रण कोण ठेवणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे. रस्त्यावर उभे असलेले हायवा, भरधाव वाहतूक आणि अरुंद जागेमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असल्याची चर्चा परिसरात आहे.
गुरुवारी गौराळा फाट्याजवळ उभ्या असलेल्या हायवा ट्रकला मागून धडक दिल्याने शुभम ठावरी (रा. आष्टी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) या युवकाचा हात खांद्याजवळून तुटल्याची प्राथमिक माहिती आहे. शुभम हे बजाज फायनान्समध्ये कार्यरत असून रिकव्हरीचे काम आटोपून मारेगावहून वरोऱ्याकडे जात होते.एकीकडे हायवांची प्रचंड वर्दळ आणि दुसरीकडे सलग अपघातांची मालिका यामुळे गौराळा फाटा वाहनचालकांसाठी धोक्याचा ‘डेथ झोन’ ठरत आहे का? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अपघात रोखण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन, पार्किंगवर नियंत्रण आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे.
विधानसभेतील मोठे नेतेमंडळी मात्र सुस्त का?
“गौराळा फाटा ‘डेथ झोन’ बनत असताना वणी विधानसभेतील नेतेमंडळी मात्र सुस्त का? माईन्समधून ये-जा करणाऱ्या हायवांची वर्दळ आणि त्यातून होणारे अपघात त्यांना दिसत नाहीत का? जनतेच्या जीविताचा प्रश्न गंभीर असताना नेत्यांची ही डोळेझाक संशय निर्माण करणारी आहे. माईन्सधारकांशी असलेल्या कथित जवळीकीमुळेच हा प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जातोय. यात महत्त्वाचा म्हणजे नेते मंडळीचा खूप मोठा आर्थिक स्त्रोत या खदानीतून मिळत असल्याची चर्चा आहेत आणि मोठमोठ्या नेत्यांना मोठमोठे पॉकेट ची रसद पुरविली जात असते अशी चर्चा आहेच..

