अजय कंडेवार, वणी : वणी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे लक्ष्मीपूजनाच्या शुभदिनीही शेतकऱ्यांच्या वेदनेचा आवाज बुलंद करण्यात आला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी ‘काळी दिवाळी आंदोलन’ करत चटणी-भाकरचा फराळ करून शासनाचा निषेध नोंदवला.

अस्मानी आणि सुलतानी संकटांनी विदर्भातील शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत. कर्जात बुडालेल्या बळीराजाला शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही. “प्रत्येकी ५० हजार रुपये हेक्टरी मदत आणि सातबारा कोरा” करण्याचं वचन सरकारने दिलं, पण ते आजही केवळ कागदावरच आहे, अशी शिवसेनेची जोरदार टीका यावेळी करण्यात आली.वणीतील छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णांकित पुतळ्यासमोर आमदार संजय देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं. कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खात शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करत शेतकऱ्याला न्याय द्या,अन्यथा सत्ता सोडा. अशा घोषणा दिल्या.यावेळी तालुक्यातील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि राग दोन्हीही दिसून येत होते कारण बळीराजाच्या दिवाळीत आजही दिवे नाहीत, फक्त अंधार आहे.

