अजय कंडेवार,वणी: निवडणुकीच्या चाहुलीने तालुक्यात राजकारणाचा थर्मामीटर झपाट्याने चढू लागला आहे. आजवर शांत असलेले राजकीय मंडळी अचानक रस्त्यावर उतरत आहेत. कुठे आंदोलनांची आतषबाजी, कुठे निवेदनांचा पाऊस – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे जणू “धूम-स्टाईल” राजकारण सुरू झाले आहे.

तहसील कार्यालयासमोर मोर्चे, पंचायत समितीसमोर घोषणाबाजी, तर नगरपरिषद कार्यालयात निवेदनांची रांग… जिकडे तिकडे केवळ आंदोलने आणि निवेदनांची गर्दी. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर आवाज उठवला जातो खरा; पण त्यामागे निवडणुकीच्या मैदानात आपली ताकद दाखवण्याचा सूर अधिक ठळकपणे उमटताना दिसतो आहे.
यात अनुभवी नेत्यांसोबतच नवखे चेहरेही मागे नाहीत. “आम्हीच खरे जनतेचे कैवारी” असा गजर करत तेही झेंडे, फलक, बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावर पोस्टांची धूम, तर प्रत्यक्षात आंदोलनांचा झगमगाट – असे दुहेरी अस्त्र वापरून मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे.मात्र, या गोंधळात मूळ प्रश्न सुटणार का? की निवडणुकीपर्यंत फक्त आंदोलने-निवेदनांचा खेळ रंगणार? हेच बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.निवडणुकीच्या तोंडावर आंदोलने-निवेदनांची ही धूम मतदारांच्या डोळ्यांत धूर फेकण्यासाठी नाही, तर विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी असावी – हीच खरी जनतेची अपेक्षा असेल अशी जनसामातून बोलल्या जात आहे.

