Ajay Kandewar, Wani :- वणी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून शिवसेना (शिंदे गट)च्या सौ. मीनाक्षी राजू साठे या नगरसेविका पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात निवडणुकीची चुरस वाढली आहे. स्थानिक पातळीवर राजू साठे यांचा दांडगा जनसंपर्क, प्रभावी ओळख व सर्वसमावेशक कार्यशैली याचा मीनाक्षी साठे यांच्या मताधिक्यावर सकारात्मक परिणाम होईल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
सुस्वभावी, लोकाभिमुख आणि सामाजिक उपक्रमांत सातत्याने सक्रीय असलेल्या मीनाक्षी साठे यांच्या उमेदवारीला प्रभागातील महिलांपासून तरुणांपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक समस्यांवर थेट संवाद साधण्याच्या त्यांच्या पद्धतीची मतदारांकडून दखल घेतली जात आहे.उमेदवारी जाहीर करताना सौ. मीनाक्षी राजू साठे यांनी प्रभागातील पायाभूत सुविधांचा विकास, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, तरुणांसाठी उपलब्ध संधींचा विस्तार आणि दैनंदिन नागरी सुविधांचे सुदृढीकरण या आपल्या प्रमुख प्राधान्यांची घोषणा केली. “नागरिकांच्या समस्या समजून घेऊन ठोस उपाययोजना राबवणे हेच माझे ध्येय,” असे त्या म्हणाल्या.
प्रभागातील काही रहिवाशांनी तरुण, नवनवीन विचारांची आणि लोकांमध्ये सहज मिसळणारी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर नवीन नेतृत्व उदयास येत असल्याने प्रभागास चालना मिळेल, असे मतदारांचे मत आहे.यामुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये सौ. मीनाक्षी राजू साठे यांचे पारडे सध्या जड मानले जात असून, आगामी काही दिवसांत प्रचाराची रंगत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

