Ajay,Wani:- राजकीय वर्तुळात सध्या एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. एखाद्या नेत्याचा किंवा “साहेबांचा” वाढदिवस जवळ आला की काही कार्यकर्ते आणि चापलूस पदाधिकारी अचानक सक्रिय होतात. शुभेच्छा फलक, सत्कार, कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांच्या नावाखाली व्यापारी, उद्योजक, कंत्राटदार, काही मोजके मलाईदार विभाग आणि विविध व्यावसायिकांकडे भीक मांगू मागणी केली जात असल्याची चर्चा अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. “साहेबांचा वाढदिवस आहे”, “कार्यक्रम मोठा आहे“, “साहेबांसाठी सहकार्य करा”, अशा शब्दांत मदत मागितली जाते. मात्र ही मदत खरोखर स्वेच्छेने दिली जाते की दबावाखाली, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
विशेष म्हणजे, अनेक व्यावसायिकांमध्ये अशीही कुजबुज आहे की सहकार्य न करणाऱ्यांविरोधात अचानक तक्रारी, निवेदने, आंदोलने किंवा विविध प्रकारचा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा केवळ योगायोग आहे की दबावतंत्राचा भाग, याची चर्चा राजकीय आणि व्यावसायिक वर्तुळात रंगत आहे. जर वाढदिवस हा जनसंपर्काचा आणि समाजसेवेचा उत्सव असेल, तर त्यासाठी कोणावरही आर्थिक किंवा मानसिक दबाव आणण्याची गरज काय? अशा प्रकारांमुळे संबंधित नेत्यांची प्रतिमाच मलीन होत नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.
राजकारणात निष्ठा असावी, चापलुसी नव्हे; समाजसेवा असावी, सक्तीची वर्गणी नव्हे. वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली कोणालाही नाहक त्रास देणे, आर्थिक सहकार्याची सक्ती करणे किंवा सहकार्य न करणाऱ्यांना लक्ष्य करणे, अशा प्रवृत्तीला जर वेळीच आळा घातला गेला नाही, तर समाजात राजकारणाबद्दलचा अविश्वास आणखी वाढेल. त्यामुळे राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाने अशा कथित प्रकारांची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याची भावना सुजान नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
(टिप:- अजय कंडेवार थेट लिहिण्यास कुणालाही घाबरत; आणि कुणाचा बापाला जुमानत नाही. तरी सत्य मांडण्यास कुणालाही घाबरणार नाही)

