Wani : तालुक्यातील चिखली गाव परिसरात WCLच्या कामादरम्यान टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा थांबून मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये साचत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे तसेच सुपीक जमिनीचे नुकसान होत झाले असून शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत चिखली गावातील ग्रामस्थ व उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी एकत्रितपणे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) यांना निवेदन देत नैसर्गिक नाल्याचा मार्ग तातडीने मोकळा करावा, संयुक्त पंचनामे करून नुकसानाची नोंद घ्यावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यवतमाळ जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनीही घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र निवेदनाद्वारे प्रशासनाकडे WCLच्या कामाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची, महसूल, कृषी विभाग आणि WCLच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून तातडीने सामूहिक पंचनामे करण्याची तसेच नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. गावकऱ्यांचे निवेदन आणि निखाडे यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

