Wani: शहरात स्कूल बसेसचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नुकतीच लक्ष्मी नगर येथे स्वर्णलीला शाळेची एक बस फसल्याने क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून, या अनागोंदी कारभारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांनी केली.
लक्ष्मी नगर येथे अडकलेली स्वर्णलीला शाळेची बस याचीच एक बोलकी उदाहरण आहे. यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोच, शिवाय अपघाताचा धोकाही वाढतो. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत ही बाब अधिक गंभीर आहे. परंतू ठोस कारवाई होताना दिसत नाही.वाहतूक नियमांनुसार, प्रत्येक स्कूल बसची प्रवासी क्षमता निश्चित असते आणि त्यापेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही, अनेक बस चालक नियमांना धाब्यावर बसवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, वाहतूक पोलीस आणि शिक्षण विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित स्कूल बसेस आणि शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी इरशाद खान यांनी केली.

