Ajay Kandewar,Wani : तालुक्यातील ग्रामपंचायत चिखलगावमध्ये सत्ताधारी गटातील आठ सदस्यांनी दिलेल्या सामूहिक राजीनाम्यांवरून गावातील राजकारण चांगलेच तापले असून, गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत उपसरपंच सुनील कातकडे यांनी संबंधित सदस्यांवर थेट आणि गंभीर आरोपांची सरबत्ती केली.ग्रामसभेत माईक हाती घेत कातकडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “त्या आठ सदस्यांचा व्यक्तिगत विकास झाला नाही म्हणून त्यांनी राजीनामे दिले. गावाचा विकास चुलीत गेला तरी चालेल, पण स्वतःची कामे आणि स्वार्थ साधण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे.”असा थेट घणाघात आरोप केला.
दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सत्ताधारी गटातीलच आठ निवडून आलेल्या सदस्यांनी एकत्रित राजीनामे दिले होते. मात्र हे राजीनामे अद्याप मंजूर करण्यात आले नसल्याचेही उपसरपंचांनी ग्रामसभेत स्पष्ट केले.यावेळी त्यांनी जनतेसमोर सवाल उपस्थित करत म्हटले की, “ज्या नागरिकांनी विश्वासाने मतदान करून या सदस्यांना निवडून दिले, त्याच जनतेच्या मताची किंमत आज या सदस्यांना उरलेली दिसत नाही. लोकांच्या प्रश्नांपेक्षा स्वतःची ‘किंमत’ किती वाढते, याचाच विचार करून राजीनाम्याचे राजकारण सुरू आहे.”
उपसरपंचांच्या या वक्तव्यानंतर ग्रामसभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. गावातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि प्रशासनातील समन्वय यापेक्षा वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली.दरम्यान, संबंधित आठ सदस्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली तरी उपसरपंचांनी केलेल्या थेट आरोपांमुळे चिखलगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

