Wani:- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी असलेल्या “KYC” पोर्टलच्या तांत्रिक त्रुटी आणि मारेगांव तालुक्यातील आशा स्वयंसेविकांचा रेशन धान्य पुरवठा कोणत्याही पूर्वसूचने शिवाय बंद करण्याच्या शासनाच्या बेजबाबदार धोरणाविरोधात, वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि आशा वर्कर संघटना आक्रमक झाली आहे.
शेतकरी आणि आशा वर्कर्सच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या नेतृत्वात गुरुवार दिनांक ६ नोव्हेबरला मारेगांव तहसील वर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने मारेगाव प्रशासनाला निवेदन देत, सरकार आणि प्रशासनाच्या लालफितशाहीवर सडकून टीका केली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा वंचितचे राजू निमसटकर आणी आशा संघटनेच्या प्रतिनिधींनी प्रशासनास दिला. “जगाचा पोशिंदा बळीराजा अस्मानी संकटात असून त्याची दिवाळी आधीच अंधारात गेली आहे. आता तर त्याला KYC च्या जाचक अटी आणि पोर्टल बंद होण्याच्या सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. हे अत्यंत खेदजनक असून, KYC पोर्टलवरील तांत्रिक अडचण तात्काळ दूर करावी आणि ज्या शेतकऱ्यांचे अनुदान केवळ KYC मुळे थांबले आहे, त्यांच्या अनुदानाची रक्कम विनाविलंब व विनाअट खात्यात जमा करावी अशी जोरदार मागणी वंचितचे राजू निमसटकर यांनी यावेळी केली.
•राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन : ‘आशा’ वर्कर उपाशी…!
आरोग्य यंत्रणेच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आशा स्वयंसेविकांवर शासनाने मोठा अन्याय केल्याचा आरोप यावेळी वंचितचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केला. तर चार-चार महिन्यांचे मानधन थकीत असताना, कोणत्याही अधिकृत जीआर (GR) शिवाय गरीब व प्राधान्य कुटुंब गटातील (PHH) आशा वर्करचा रेशन धान्य पुरवठा बंद करण्यात आला. हे “राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या”चे (NFSA) सरळ सरळ उल्लंघन आहे. तुटपुंज्या मानधनावर जगणाऱ्या या सरकारच्या लाडक्या भगिनींचा आधार हिरावून घेऊन, शासनाने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आणली आहे. हा त्यांच्यावर केलेला प्रचंड मोठा अन्याय आहे. असा थेट आरोप वंचितचे राजू निमसटकर यांनी केला असून आशा वर्करचा रेशन पुरवठा पूर्ववत सुरू केला नाही, तर वंचित बहुजन आघाडी आणि आशा वर्कर संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रचंड जनआंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा वंचितचे राजू निमसटकर यांनी प्रशासनास दिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मारेगांव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मुन, कार्याध्यक्ष अनिल खैरे, महिला कार्याध्यक्ष यशोधरा लिहितकार, शहराध्यक्ष अनंता खाडे, कार्याध्यक्ष रवी तेलंग, आशा वर्कर संघटनेच्या तालुकाध्यक्ष शितल येसेकार, सुजाता दुर्योधन, गीता जीवने यांचे सह संजय जीवने, विनेश मेश्राम, विनय गजभिये, राजू पाटील, सुनील वाघमारे, अमरनाथ तेलतुंबळे, विप्लव ताकसांडे, प्रकाश पाटील, राजू भगत, राजू सिडाम, प्राणशील पाटील, निळावती मुन, पंकज साठे, किशोर कोडापे, गौतम दारुंडे, प्रेमदास डंबारे, रामदास आश्रम, विश्वास पाटील, तात्याजी चिकाटे, बंडू पाटील, रमेश चिकाटे, राजू पाटील, गौतम मालखेडे, माधव वाघाडे, पांडुरंग पाचभाई, दादाजी वानखेडे, अजाबराव गजभिये यांचे सह छाया डाखरे, संगीता मडावी, कल्पना शेंडे, विमल कोंडेकार, अल्का ताजने, विमल ठावरी, लता डाखरे, जयश्री भुसारी, मीना राऊत, अर्चना ठाकरे, अनिता जुनगरे, सीमा श्रीरामे, उषा खडसे, अन्नपूर्णा सोमलकार, कमल अलाम, दुर्गा कापसे, मनीषा मडावी, अर्चना मेश्राम, कुसुम गेडाम, सुरेखा पझारे, दुर्गा मोहुर्ले, छाया गेडाम, ज्योती राऊत, वनमाला आत्राम, रूपा कुमरे, सुचिता कामनवार, पंचफुला चापले यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मारेगाव तालुक्यातील आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलनाचा निर्धार आणि जनतेच्या असंतोषाची भावना यामुळे या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले होते हे विशेष.
राजू निमसटकर – वणी विधानसभा प्रमुख
वंचित बहुजन आघाडीने मांडलेले हे दोन्ही प्रश्न सध्याच्या ग्रामीण वास्तवाचे प्रतिबिंब आहेत. एका बाजूला शेतकरी मदतीसाठी वाट पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला समाजाच्या आरोग्याची जबाबदारी पेलणाऱ्या महिला अन्नसुरक्षेसाठी झगडत आहेत. सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन दोन्ही घटकांना न्याय द्यावा. अन्यथा, वणी विभागांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठे जनआंदोलन उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.

