Ajay Kandewar,वणी : यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीच्या मतदार यादीने सध्या “नातेसंबंधांचा नवा इतिहास” लिहिल्याची चर्चा रंगली आहे. मतदार यादीत कुणाचा बाप पती झाला, कुणाचा पती बाप झाला, तर काहींच्या नोंदींनी सरकारी कागदपत्रांनाच कोडे घातले आहे. मतदार यादी तयार करताना अधिकाऱ्यांनी मतदारांची माहिती तपासली की अंदाजपंचे लावले असे स्पष्ट दिसत आहे.

नगरसेविका करूणा कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविलेल्या निवेदनात या त्रुटींचा पाढा वाचला आहे. विशेष म्हणजे प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेण्यासाठी इतका कमी वेळ देण्यात आला की नागरिकांनी यादी तपासायची की आपले रोजचे काम करायचे, अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी अंतिम यादीतही अनेक चुका कायम राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लोकशाहीच्या सणात मतदार यादी ही पाया असते; पण पाया मजबूत करण्याऐवजी आधीच तडे गेलेल्या भिंतीवर रंगरंगोटी केल्यासारखी अवस्था दिसत आहे. त्यामुळे “चुकांची यादी” नव्हे तर “मतदार यादी” तयार करा, अशी उपरोधिक मागणी नागरिकांतून होत असून, निवडणूक रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करुणा कांबळे यांनी केली.

