Ajay Kandewar,Wani:- राजकारणाच्या मैदानात आजकाल एक वेगळीच स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. काही स्वयंघोषित नेते निवडणुकीत जनतेकडून स्पष्ट नकार मिळूनही स्वतःला मोठे नेते म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ना ते आमदार, ना खासदार, ना कोणते अधिकृत पद… तरीही जयंती, सत्कार, मोठमोठे मंच, भव्य सजावट आणि मोठ्या कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. जनतेच्या मनात मात्र एकच प्रश्न घुमू लागला आहे. एवढ्या मोठ्या कार्यक्रमांसाठी पैसा येतो तरी कुठून?
सामाजिक कार्यक्रमाच्या नावाखाली लोकांकडून वर्गणी गोळा करणे, व्यापाऱ्यांकडून देणग्या घेणे आणि नंतर त्याच कार्यक्रमातून स्वतःची राजकीय प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असल्याची चर्चा जोर धरत आहे. अनेक ठिकाणी “लोकांच्या सेवेसाठी कार्यक्रम” अशी घोषणा केली जाते, मात्र प्रत्यक्षात मंचावर फोटो, बॅनर आणि शक्तीप्रदर्शन यावरच भर दिला जातो. जनतेच्या प्रश्नांपेक्षा प्रसिद्धी आणि दिखावा अधिक महत्त्वाचा झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यामुळे आता जागरूक नागरिकांनीही प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. भव्य-दिव्य कार्यक्रमांसाठी लागणारा निधी नेमका कोणत्या स्त्रोतांतून येतो? त्याचा हिशोब कुठे दिला जातो? समाजसेवेच्या नावाखाली राजकीय स्वार्थ साधण्याचा हा प्रकार थांबायला हवा, अशी मागणीही होत आहे. जनतेने आता सजग राहून अशा दिखाऊ राजकारणाला प्रश्न विचारणे गरजेचे असल्याची भावना समाजात व्यक्त होत आहे.

