Wednesday, December 17, 2025
Homeवणी"जग सुंदर बनविण्यात स्त्रियांचा वाटा मोलाचा….." - वंदना आवारी (वणी)

“जग सुंदर बनविण्यात स्त्रियांचा वाटा मोलाचा…..” – वंदना आवारी (वणी)

अजय कंडेवार,वणी :- हे जग सुंदर बनविण्यात स्त्रियांचा वाटा मोलाचा राहिलेला आहे. विख्यात साहित्यिक प्रेमचंद यांना एक प्रश्न विचारला गेला की, हे संपूर्ण जग सुंदर केव्हा होईल? तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगितले की, पुरुष जेव्हा स्त्रियासारखे होतील, तेव्हा हे जग सुंदर होईल! आज आपण बघितले तर लक्षात येईल की आपल्या चौफेर तसेच जागतिक पातळीवरसुद्धा स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. स्त्रियांविषयी कळवळा आणून लिहिणारे, व्यासपीठावरून स्त्रीहक्काच्या मोठमोठ्या गोष्टी करणारे अनेक घरी स्त्रीवर आपली पुरुषी हुकुमत गाजवतात. पुरुष इतक्या संभ्रमात असतो की, आपण काय कार्य करतो याचे भानही तो ठेवत नाही.

आज रोजी पत्नीला ‘पाणी आण’, ‘अंथरूण टाक’ असे ज्या पद्धतीने आदेश देत असतात, त्यावरून वाटावे की ती त्याची पत्नी नाही तर गुलाम आहे. बाहेर ते कसे बोलतात आणि आता घरी कसे वागताहेत, याचे नवल वाटते. मी हे त्यांच्या लक्षात आणून दिले. मीही काही धुतल्या तांदळाची नाही. मी ही त्या भागातून आल्यामुळे संस्कृतीचा प्रभाव माझ्यावरही पडलेला आहे. घरी तर प्रत्येक स्त्री गुलामच आहे. अशावेळी वाचलेली पुस्तके आठवतात. स्त्रियांच्या दु:ख व वेदना डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मी भानावर येते व स्वत:ला सावरते देखील…..

आपल्या देशात स्त्रीला देवी म्हणून पूजले जाते. तिला एकीकडे सर्वश्रेष्ठ समजले जाते, तर दुसरीकडे हुंड्यासाठी जाळून मारले जाते. मुली होऊ लागल्या की, नवरा तिला ‘पापीन’ समजतो. सर्व खापर स्त्रीच्या माथी फोडले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव आणि अंधश्रद्धेचा प्रभावाला स्त्री बळी पडते. अशावेळी दोष केवळ स्त्रीच्या वाट्याला येतो. मागच्या दोन दशकांत लिंगचाचणी करून कितीतरी मुली गर्भात मारल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. भ्रूणहत्या केल्या गेल्या आहेत. परिणामी मुलींचे प्रमाण कमी झाले. काही समाजात अनिष्ट परिणाम दिसत आहेत. ही आपली मानसिकता बदलली नाही, हे प्रकार थांबविले नाहीत तर त्याचे विपरीत परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील.

या देशात स्त्रीमुक्तीची चळवळ महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजा राममोहन रॉय, डॉ. अनी बेझंट आदींनी सुरू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात स्त्रीला पुरुषांइतका समानतेचा अधिकार बहाल केला. त्यामुळे स्त्रीच्या कपाळावरचा काळा डाग पुसला गेला. आज सुशिक्षित महिला पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करीत आहेत. महत्त्वाची पदे भूषवित आहेत. ही अभिमानाची बाब असली तरी गाव, खेडे, झोपडपट्टी, पालं, शहरांचा काही भाग बघितला की मन अस्वस्थ होते. स्त्रियांची ससेहोलपट सुरूच आहे. राजकारणात महिलांना आरक्षण दिले. त्यांच्यावतीने कारभार मात्र बावरे झालेले नवरे करताना आपण बघतो. हे थांबायला हवे.

हे सर्व बदलण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. स्त्रीशिक्षण निर्मूलन व घरात स्त्रीला समान दर्जा देणे आपल्या हातात आहे. आपापल्या परीने स्त्रीचा विकास, हा ध्यास घेऊन कार्य करणे महत्त्वाचे आहे. तशी सुरुवात स्वत:पासून करणे अतिमहत्त्वाचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments