Ajay Kandewar,Wani : चिखलगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी असा प्रकार घडला, जो गावाच्या इतिहासात कधीच पाहायला मिळाला नव्हता. ग्रामसभेत विविध विकासात्मक मुद्दे मांडले जात असताना, गावकऱ्यांनी विशेषतः युवकांनी आक्रमक भूमिका घेत थेट प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले. अतिक्रमणाचा मुद्दा हाती घेत ग्रामपंचायत सचिवांना जाब विचारण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण ग्रामसभा चांगलीच तापली.या ग्रामसभेचे वैशिष्ट्य म्हणजे चिखलगावच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर जनआक्रोश उफाळून आला.
ग्रामपंचायतमधील कथित हुकूमशाही कारभार, वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न आणि निवडक लोकांना पाठीशी घालण्याच्या आरोपांमुळे युवकांचा संयम सुटला.याच दरम्यान एक गंभीर बाब समोर आली — सरपंच उपस्थित असूनही केवळ मानाच्या खुर्चीत बसलेला, तर प्रत्यक्ष कारभार आणि उत्तरे देण्याची भूमिका उपसरपंच बजावत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
ग्रामसभेत अतिक्रमणावर निवडक कारवाई, गावातील कोळसा प्लॉटच्या प्रश्नावरून वाढते प्रदूषण, धूळ-धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, तसेच पूर्वी मंजूर कामांचा हिशोब हे मुद्दे विशेष गाजले. या प्रत्येक प्रश्नावर सरपंच व सचिवांना थेट प्रश्न विचारले गेले, मात्र त्यावर उत्तर देताना उपसरपंचच पुढे येत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. “हा लोकशाही कारभार आहे की एका व्यक्तीकेंद्रित सत्ता?” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला.युवकांनी ग्रामसभेत स्पष्ट शब्दांत सांगितले की, ग्रामपंचायत म्हणजे हुकूमशाही चालवण्याचे ठिकाण नाही. अतिक्रमणावर कारवाई का होत नाही, कोळसा प्लॉटमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना का राबविल्या जात नाहीत, आणि ग्रामपंचायतीच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता का नाही.या मुद्द्यांवर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने वातावरण चिघळले. याच पार्श्वभूमीवर “सरपंच नामधारी ठरतोय का?” हा प्रश्न अधिक तीव्र झाला.
आता “त्या भाऊ” ची “भाऊगिरी” चालणार नाही… असा थेट संदेश?
एकूणच चिखलगाव ग्रामसभा ही गावाच्या इतिहासातील पहिली अशी ग्रामसभा ठरली, जिथे सत्तेच्या रचनेवर, निर्णय प्रक्रियेवर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अतिक्रमण, कोळसा प्लॉट, प्रदूषण यांसह सरपंच-उपसरपंचांच्या भूमिकेतील विसंगतीमुळे ही ग्रामसभा केवळ बैठक न राहता जनतेचा इशाराच ठरली आहे. तसेच गावातील युवकांनी एकाधिकारशाहीचे लचके तोडल्याचे प्रकारही या ग्रामसभेतून दिसून आले.कायद्याच्या चौकटीत राहून गावकऱ्यांनी स्पष्ट केले की, आता “त्या” “भाऊ” ची “भाऊगिरी” चालणार नाही असाही एक संदेश या ग्रामसभेतून देण्यात आला अशी जनमानसातून चर्चा आहे.

