Ajay Kandewar,Wani : वणी तालुक्यातील चिखलगाव ग्रामपंचायतीत आठ सदस्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली असून, यामागचे खरे कारण आता हळूहळू समोर येत आहे. विश्वसनीय माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात सरपंच महिलेचा पती थेट हस्तक्षेप करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. विशेषतः महत्त्वाचे विषय पुढे जाऊ दिले जात नाहीत, विकासाची कामे अडवली जातात आणि निर्णय निवडून आलेल्या सदस्यांपेक्षा वेगळ्याच ठिकाणी घेतले जात असल्याने सदस्य वैतागले होते, म्हणून राजीनामा दिल्याची चर्चा आहे. फक्त उपसरपंच पद असताना कारभारावर सरपंच सारखी पकड ठेवण्याची ही पद्धत लोकशाहीला शोभणारी नाही, असा संताप गावात व्यक्त केला जात आहे.ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात सरपंच महिलेच्या पतीचा कथित हस्तक्षेप हा मुख्य आता राजीनामा नाट्य वादाचा मुद्दा ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
विकास रखडलेला असतानाच चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या शेकडो कोल डेपोचा मुद्दा पुढे आला आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने अनेक वेळा या कोल डेपो धारकांना सूचना दिल्याचे समोर आले आहे. मात्र त्यानंतर कारवाई होत नाही, याबाबत नागरिक प्रश्न विचारत आहेत. या प्रकरणांमध्ये सरपंच महिलेचा पती मध्यस्थी करतो, अशी मोठी चर्चा आहे. त्यामुळे “या कोळसा व्यवसायात त्यांचे हात तर काळे नाहीत ना?” असा सरळ सवाल आता लोक उघडपणे विचारू लागले आहेत.
सध्या गावात “भूखंड लाटून श्रीखंड खाणारे” असा उल्लेख….
दरम्यान, “भूखंड लाटून श्रीखंड खाणारे” असा उल्लेख सध्या गावात वारंवार केला जात असून, सरपंच महिलेच्या पतीशी संबंधित काही प्रकरणे पुढील वृत्तात समोर येणार असल्याची चर्चा आहे. ही सर्व बाबी तपासल्यानंतरच स्पष्ट होतील, हे खरे असले तरी संशय निर्माण होईल अशी परिस्थिती नक्कीच आहे. विशेषतः असेही बोलल्या जात आहे की, “सर्व पदे घरातच” अशी बोंब असताना एक प्रश्न खोचक स्वरूपात उपस्थित होतो की,गावातील वीस ते बावीस हजार जनतेत एकही सक्षम व्यक्ती गावात उरली नाही का ? एकहाती ठिय्या मांडून सत्ता चालवणाऱ्या या भूमिकेची चौकशी झालीच पाहिजे आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर आलेच पाहिजे, अशी ठाम मागणी चिखलगावकर करत आहेत.

