Wednesday, December 17, 2025
Homeवणी"आधी पुनर्वसन, मग विस्थापन" ह्यावरून फिस्कटली चर्चा

“आधी पुनर्वसन, मग विस्थापन” ह्यावरून फिस्कटली चर्चा

• राजूर गाव वाचविण्यासाठी ऐन दिवाळीत 6 व्या दिवशीही उपोषण सुरू

● SDO सोबत झालेल्या चर्चेत संघर्ष समिती मागण्यांवर ठाम


वणी :राजूर येथे वेगवेगळ्या कंपनीच्या आगमनाने सुरू झालेल्या कोळसा सायडिंग साठी येथील राहिवासीयांना घरे खाली करून देण्याचा नोटिसांमुळे सुरू केल्या गेलेल्या राजूर बचाव संघर्ष समिती च्या महिलांच्या बेमुदत आमरण उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपविभागीय अधिकारी यांनी आमदारांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीत पुनर्वसनाच्या मुद्यावरून चर्चा फिस्कटल्याने आज सहाव्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे.

राजूर गावात वेगवेगळ्या कोळसा कंपन्यांच्या कोळसा वाहतूक करण्यासाठी रेल्वेच्या कोळसा सायडिंग सुरू झाल्या असून ह्या प्रदूषण निर्माण करणाऱ्या कोळसा सायडिंगला ना प्रदूषण नियंत्रण बोर्डाची ना स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आहे. अनधिकृतपणे सुरू असलेल्या ह्या कोळसा सायडिंग ची संख्या वाढविण्यासाठी गावातील रहिवासीयांची घरे खाली करण्यासाठी रेल्वे व वेकोलीने येथे गेल्या 50 वर्षांपासून वास्तव्य करून राहत असलेल्या नागरिकांना नोटिसा देने सुरु केले आहे.

रहिवासी क्षेत्रालगत ह्या कोळसा सायडिंग उभारण्यात आल्याने गावात प्रचंड वायू, जल व ध्वनी प्रदूषण होत असून येथील नागरिकांना अनेक दुर्धर रोग होत आहेत. ह्यातच घरे खाली करण्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने येथील नागरिकांवर दुहेरी संकटासहित शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास वाढला आहे. अश्या संकटात सापडलेल्या नागरिकांनी राजूर बचाव संघर्ष समिती चे माध्यमातून एकत्र येत 1) गावातून प्रदूषण निर्माण करणारी व अवैधरित्या सुरू असलेल्या कोळसा सायडिंग गावातून हद्दपार करा, 2) गावकऱ्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरील जड वाहतूक बंद करा व 3) रेल्वे व वेकोली कडून विस्थापित करण्याअगोदर पुनर्वसन करून नुकसानभरपाई द्या. ह्या मागण्यांसाठी गेल्या 10 महिन्यांपासून अनेकदा निवेदने, दोनदा रास्ता रोको आंदोलन केले व आता दि. 17 ऑक्टो. पासून महिलांचे बेमुदत आमरण उपोषणाला सुरू करण्यात आली. ह्या उपोषणाला वणी विभागातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

उपोषण मंडपाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 5 व्या दिवशी भेट दिली असता त्यांनी उपविभागीय अधिकारी यांचे सोबत चर्चा करून रेल्वे व वेकोली अधिकारी यांचे समक्ष संघर्ष समिती सोबत दि. 21 ऑक्टो. ला बैठक बोलाविली. त्यानुसार उपविभागीय कार्यालयात मागण्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले की, रेल्वे व वेकोली कडून यानंतर घरं खाली करण्याच्या नोटिसा देण्यात येणार नाही, स्थानिक प्रशासन ( महसूल व पोलीस ) यांना विश्वासात घेतल्या शिवाय विस्थापित केल्या जाणार नाही असे सांगितले. परंतु संघर्ष समिती सदस्यांनी “आधी पुनर्वसन व नंतर विस्थापन” ह्या मागणीवर ठाम राहिल्याने उपोषण स्थगित होऊ शकले नाही.
उपोषणाचे सहाव्या दिवशी दिशा अमृत फुलझेले, नाजूका प्रशांत बहादे, वीणा अमर तितरे व शालू संजय पंधरे यांचे उपोषण सुरू आहे.


ह्या बेमुदत आमरण उपोषनाला यशस्वी करण्यासाठी सरपंच विद्याताई पेरकावार, संघदीप भगत, वृषाली खानझोडे, प्रणिता असलम, अशोक वानखेडे, डेव्हिड पेरकावार, मो. असलम, कुमार मोहरमपुरी, प्रवीण खानझोडे, ऍड. अरविंद सिडाम, जयंत कोयरे, नंदकिशोर लोहकरे, सावन पाटील, प्रदीप बांदूरकर, साजिद खान, अनवर खान, अक्रम वारसी, अभिषेक अंडेल, सनी राजनालवर, अजित यादव, अमृत फुलझेले, नितीन मिलमिले, मनीषा परचाके , अनिल डवरे, ग्रापं सदस्य दीपाली सातपुते, पायल डवरे, बल्ली यादव, वैभव मजगवली परिश्रम घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments