Ajay,Wani:- शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर अखेर शिवसेनेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेला निवेदन सादर करून शहरातील वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. केवळ कागदोपत्री उपाय न करता नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळेल, अशी ठोस अंमलबजावणी करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात कोविड काळात बंद करण्यात आलेली एकेरी वाहतूक व्यवस्था (वन-वे) पुन्हा सुरू करणे, टिळक चौकात सतत वाहतूक पोलीस तैनात करणे तसेच कामगार चौकात कायमस्वरूपी वाहतूक चौकी उभारणे अशा महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. शहरातील वाढती वाहनसंख्या, अनियंत्रित पार्किंग आणि चौकांमधील सततची कोंडी यामुळे नागरिकांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत असून, याकडे प्रशासनाने आता केवळ पाहत बसण्याऐवजी निर्णायक पावले उचलावीत, अस निवेदनातून म्हटले.
शहरातील वाहतूक प्रश्न हा आता केवळ असुविधेचा नसून नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडित गंभीर विषय बनला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावेळी विजय चोरडिया, दीपक कोकास, शुभम गोरे, वसुधा ढगे, मनीषा कोंगरे, भाग्यश्री वैद्य, सोनाली पुरी, हिमांशू बोहरा, शम सिद्दीकी, अनिल ढगे, अमृत पुरी, सुनील डोंगरे, राहुल उपाते आणि प्रज्योत ठावरी उपस्थित होते.

