Wednesday, June 10, 2026
Homeएडवोटोरियलबहुआयामी व्यक्तिमत्त्व : डॉ. अशोकभाऊ जीवतोडे

बहुआयामी व्यक्तिमत्त्व : डॉ. अशोकभाऊ जीवतोडे

Desk Wani:- पूर्व विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे, शिक्षणाचा समृद्ध वारसा जपत समाजजागृतीची प्रभावी चळवळ उभी करणारे एक धडपडे नेतृत्व म्हणजे डॉ. अशोकभाऊ जीवतोडे.११ जून १९६१ रोजी चंद्रपूर येथे जन्मलेल्या अशोकभाऊंचा वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा क्षण नसून हजारो विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या चाहत्यांसाठी प्रेरणेचा दिवस असतो. आपल्या कार्यकर्तृत्वाने अनेकांना दिशा देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने शिक्षण, समाजकारण आणि संघटन कौशल्य यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे.

एम.कॉम., एम.एड., एम.फिल. (वाणिज्य), एम.ए. (अर्थशास्त्र), पीएच.डी. (शिक्षणशास्त्र) आणि पीएच.डी. (वाणिज्य) अशी त्यांची भक्कम शैक्षणिक पात्रता आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत.स्वर्गीय शिक्षणमहर्षी श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत अशोकभाऊ गेल्या २५ वर्षांपासून विदर्भातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून यशस्वी नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था सातत्याने प्रगतीपथावर असून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत आहे.

त्यांनी जनता शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूरचे प्राचार्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष, गोंडवाना विद्यापीठातील अधिष्ठाता व अध्यक्ष, तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील सहभागी सदस्य अशी अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. शासनाच्या विविध शैक्षणिक समित्यांमध्येही त्यांचे मार्गदर्शन लाभत असते.संस्था चालविणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसते; ती एक कला असते. विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, शिक्षणाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्याशी समतोल राखत संस्थेची प्रतिष्ठा अबाधित ठेवण्याचे मोठे कौशल्य अशोकभाऊंमध्ये आहे. विलक्षण स्मरणशक्ती, वेळेचे अचूक नियोजन, माणसांची अचूक पारख आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची विशेष वैशिष्ट्ये आहेत.

त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित होणारा कोणताही कार्यक्रम हा केवळ कार्यक्रम राहत नाही, तर तो एक संस्मरणीय सोहळा ठरतो. सूक्ष्म नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि भव्य आयोजन यामुळे त्यांच्या कार्यक्रमांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे.अत्यंत मोठ्या संस्थेचे प्रमुख असूनही त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नाही. साधेपणा, विनम्रता आणि सर्वांना सहज उपलब्ध असणारा स्वभाव ही त्यांची खरी ताकद आहे. गरज पडल्यास ते कठोर भूमिका घेतात; पण त्याचवेळी आपुलकीने सर्वांना जवळ घेऊन चालतात.

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाइतकेच त्यांचे सामाजिक कार्यही व्यापक आहे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान, सामुदायिक विवाह सोहळे, कीर्तन-व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृती अशा विविध उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.स्वतंत्र विदर्भ राज्य चळवळ आणि ओबीसी समाज चळवळ यामध्ये त्यांनी विशेष नेतृत्व केले. विदर्भाच्या प्रश्नांवर जनमत जागृत करण्यासाठी त्यांनी नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये व्यापक जनसंपर्क मोहीम राबविली. दरवर्षी १ मे रोजी हजारो विदर्भप्रेमींच्या उपस्थितीत विदर्भ राज्याचा प्रतीकात्मक ध्वज फडकावण्याची परंपरा त्यांनी जोपासली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून पूर्व विदर्भात ओबीसी समाजाचे संघटन उभारण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर संघटन विस्तारून त्यांनी विविध जाती-जमातींना एकत्र आणण्याचे कार्य केले. अधिवेशने, संमेलने, मोर्चे आणि आंदोलनांच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली.८ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या ऐतिहासिक ओबीसी मोर्चामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून तब्बल बावीस हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. या जनआंदोलनामुळे राज्य शासनाला ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करावी लागली. हा त्या व्यापक जनजागृतीचा महत्त्वपूर्ण परिणाम मानला जातो.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर त्यांची विशेष श्रद्धा आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या संघटनात्मक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असून प्रत्येक गावात सेवा मंडळाचे कार्य बळकट व्हावे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.समाजकार्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करण्याची त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अनेक पतसंस्थांना त्यांनी उभारी दिली, सहकार क्षेत्राला बळकटी दिली आणि असंख्य युवकांना रोजगार, मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून दिल्या. अनेक गरजू कुटुंबांना त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला; परंतु त्याची कधीही प्रसिद्धी केली नाही.त्यांच्या संवेदनशीलतेचे अनेक प्रसंग सांगितले जातात. एका गरीब कर्मचाऱ्याला नोकरीसाठी ये-जा करण्यासाठी दुचाकीची गरज असल्याचे कळताच त्यांनी त्याला त्याच दिवशी दुचाकी उपलब्ध करून दिली. अनेकांच्या विवाहासाठी, घरासाठी आणि शिक्षणासाठी त्यांनी निःस्वार्थ मदत केली आहे.शिक्षण क्षेत्रातील त्यांची दूरदृष्टी विशेष उल्लेखनीय आहे. पुणे, मुंबई, नागपूर किंवा हैदराबादसारख्या शहरांमध्ये मिळणाऱ्या गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सुविधा त्यांनी चंद्रपूरमध्ये उपलब्ध करून दिली. जनता करिअर लॉन्चरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये यशस्वी झाले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना संस्थेच्या शाखांमध्ये विनामूल्य प्रवेश देण्याचा संवेदनशील निर्णयही त्यांनी घेतला.

डॉ. अशोकभाऊ जीवतोडे यांचे व्यक्तिमत्त्व हे शिक्षण, संघटन, समाजकारण, नेतृत्व, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यांचे विलक्षण मिश्रण आहे. त्यांनी घडवलेली माणसे, उभारलेल्या संस्था आणि निर्माण केलेल्या चळवळी हेच त्यांच्या कार्याचे खरे स्मारक आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड कार्यशक्ती देवो, हीच सदिच्छा.

– प्रा. रविकांत वरारकर जनता महाविद्यालय, चंद्रपूर

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page