Ajay kandewar,Wani:- वणीतील राजकारण पुन्हा एकदा धडकी भरवणाऱ्या वळणावर आलं आहे. एका प्रभावी पक्षातील मोठा गट हा थेट शिवसेना शिंदे गटाच्या गळ्यात हार घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा तालुक्यात तापली आहे. या घडामोडींनी राजकारणात भूकंप घडवण्याची चिन्हं तर दिसत आहेतच, पण त्याचबरोबर आगामी स्थानिक निवडणुकीत या पक्षाला मोठा फटका बसणार हे आता उघड गुपित ठरत आहे.

या पक्षाने इतक्या वर्षांपासून गावागावांत मुळे रोवली होती. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, पदाधिकारी, गटप्रमुख यांच्या जोरावर निवडणुका जिंकत आले. पण आता तोच गट जर शिंदे गटाकडे वळला, तर मतदारसंघात कार्यकर्त्यांचा पाया ढासळल्याशिवाय राहणार नाही. ‘किल्ला आतून ढासळला की बाहेरून कितीही बुरुज बांधले तरी टिकत नाही’ – अशीच अवस्था या पक्षाची होणार आहे, असा कटाक्ष प्रतिस्पर्धी काढताना दिसत आहेत.भाजपमध्ये “हे आमच्या फायद्याचं” असं बोललं जात असलं, तरी कार्यकर्त्यांचा ओघ खरोखर वळेल का यावर शंका आहे.काँग्रेसला तर या भूकंपाने अजूनच “नेत्यांची टंचाई” जाणवण्याची चिन्हं आहेत. आणखी काहींना धक्का बसणं साहजिकच, कारण त्यांच्या नावावर चालणारा भावनिक खेळ आता आणखी कमकुवत होऊ शकतो.
दरम्यान, सामान्य मतदार या हालचालींकडे वेगळ्या नजरेने पाहतोय. “गट फुटला म्हणून आमचं जीवन बदलणार आहे का? शेतकरी संकटात, बेरोजगार रस्त्यावर, तर राजकारणी फक्त ‘गटांतर’ करण्यात गुंग” – असा सवाल गावागावात चर्चेत आहे.राजकारणात गटबाजी, पदरमोड, गळाभेट या नेहमीच्याच गोष्टी झाल्या आहेत. पण यावेळी वणीतील या पक्षाचा मोठा गट जर खरोखरच शिंदे गटात गेला, तर हा भूकंप केवळ पक्षापुरता मर्यादित राहणार नाही. ही निवडणूकच उलथापालथ करणारी ठरू शकते.आता बघायचं एवढंच – मतदार या भूकंपाला फटका देतात, की पुन्हा ‘जुनाच खेळ’ पाहून शांत बसतात?

