Ajay kandewar ,Wani:- मगरगट्ट वेकोलि प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात व स्थानिक जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली उकणी खाण रस्त्यावर तीन तास ठिय्या देऊन भव्य चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले.
•जनतेचे मूलभूत प्रश्न प्रखरतेने मांडले
उकणी, निलजई परिसरातील गावांमध्ये रस्त्यांची झालेली बिकट दुरवस्था, जमीन संपादन प्रक्रियेत झालेला अन्याय, विस्थापितांना न मिळालेला न्याय्य मोबदला, स्थानिक युवकांना नाकारलेला रोजगार, शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा अभाव तसेच शेतकऱ्यांना मिळालेली अपुरी नुकसान भरपाई या सर्व प्रश्नांचा मुद्दाम प्रशासनाकडून होत असलेला दुर्लक्षपूर्ण कारभार आंदोलनात तीव्रतेने उचलून धरला गेला.गावातील खड्डेमय व धोकादायक बनलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना दररोज हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अपघातांची वाढती संख्या यामुळे मोठा संताप उसळला आहे. तसेच सरकारी विकासकामांसाठी झालेले जमीन संपादन अद्यापही प्रलंबित असून शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळालेला नाही. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधींचा अभाव, शैक्षणिक सोयीसुविधांचा तुटवडा आणि वारंवार होणाऱ्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान – या सर्व प्रश्नांनी ग्रामस्थांच्या असंतोषाला तोंड फुटले.
•आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये
गावकरी, वेकोलि कर्मचारी, काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मुख्य चौकात ठिय्या धरला. प्रखर घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला व जवळपास तीन तास वाहतूक ठप्प राहिली. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता; मात्र संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले.आंदोलनादरम्यान वेकोलि अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आश्वासन दिले. तथापि, “जनतेच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष देऊन सकारात्मक तोडगा काढला गेला नाही, तर आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल” असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव संजय खाडे यांनी दिला.

