Ajay Kandewar,Wani : शहरातील शास्त्रीनगर परिसरात अक्षय बोढे याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणात वणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुख्य आरोपी अमन रामानंद घागी याला घटनेच्या दिवशी अटक केल्यानंतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने अवघ्या 48 तासांत आणखी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून एक आरोपी अद्यापही फरार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मनीष भारत इंगळे (22), रोहन गुलाब खंडारे (20), अमन रामानंद घागी (28) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. सर्व आरोपी हे चंद्रपूर येथील रहिवासी आहेत.
गुरुवारी रात्री अक्षय बोढे याच्या घरी पत्नीला होत असलेल्या कथित त्रासाच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले आणि धारदार शस्त्राने अक्षयवर वार करण्यात आले. घटनेनंतर मुख्य आरोपी अमन घागी याला तत्काळ अटक करण्यात आली होती. त्यानंतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वणी पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली API कपिल पाटील, श्याम राठोड, नंदकुमार पुपुलवार, हरी दळवे व चालक आखूड यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. विशेष पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून उर्वरित फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास PSI सुयोग महापुरे करीत आहेत

