Ajay kandewar,Wani – वणी नगरपरिषदेचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. मूलभूत सुविधा देण्यात अपयश आलेली ही परिषद स्वतःच्या चुका लपवण्यासाठी आणि तिजोरी भरण्याच्या नादात थेट सामान्य जनतेच्या डोक्यावर जुलमी करांचा डोंगर फेकत आहे. बिल्डर-डेव्हलपर्स आणि निवडक कंत्राटदारांच्या खिशात पैसे भरणारी योजना मात्र टप्प्याटप्प्याने राबवली जाते, हेच खरे नगरपरिषदेचे आजचे वास्तव.

शहरात पाणीपुरवठ्याची दयनीय अवस्था, मृतप्राय जलशुद्धीकरण केंद्र, ब्लिचिंग पावडर मिसळलेले पाणी, वाढते आरोग्यविषयक आजार, कचऱ्याचा प्रश्न, उजाड रस्ते – या सर्व समस्या वर्षानुवर्षे सोडवता न येणाऱ्या नगरपरिषदेच्या गळ्यात आता भ्रष्टाचाराचे ओझे घट्ट अडकले आहे.त्यातही हद्दवाढ करून विकासाचा आभास निर्माण करणे हा प्रकार म्हणजे थेट जनतेची फसवणूकच.याच पार्श्वभूमीवर माजी आमदार तथा (शिंदे)शिवसेना यवतमाळ-चंद्रपूर समन्वयक विश्वास नांदेकर यांनी नगरपरिषदेवर जोरदार हल्लाबोल करत पत्रकार परिषद घेतली. “जनतेच्या घामाचा पैसा वाया घालवून बिल्डर-डेव्हलपरना माया दाखवणारे हे सगळे डावपेच आम्ही सहन करणार नाही. जनतेवर लादलेले पाशवी कर परत घेणे हाच एकमेव मार्ग आहे” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
२९ सप्टेंबर रोजी शिवसेनेतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून नगरपरिषद कार्यालयासमोर करपावत्यांची होळी करून प्रशासनाला जागे करण्याची भूमिका घेण्यात आली आहे.शिवसेनेचा ठाम दावा आहे की,जनता जबाबदार नाही, मग तिच्यावर करांचा डोंगर का?,नगरपरिषदेने हद्दवाढीचा खेळ बंद करून तिजोरीतील गळती थांबवावी व विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार झाकण्याचा डाव यापुढे चालणार नाही.” वणीकरांचा आक्रोश आता उफाळून आला आहे. जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर उत्तरं न देता करांच्या ओझ्याखाली नागरिकांना चिरडण्याचा डाव आखणाऱ्या नगरपरिषदेवर शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. २९ सप्टेंबर हा दिवस नगरपरिषदेच्या अकार्यक्षमतेविरोधात वणीकरांच्या असंतोषाचा साक्षीदार ठरणार, हे निश्चित! या पत्रकार परिषदेत यवतमाळ चंद्रपूर जिल्हा समन्वयक व माजी आमदार विश्वास नांदेकर, वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे व शहर प्रमुख शिवराज पेचे यांची उपस्थिती होती.

