Ajay,Wani : यवतमाळ जिल्ह्यातील रोजंदारी वनमजुरांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी दीर्घकाळ संघर्ष करणारे कंत्राटी वनमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमाशंकर शुक्ला यांनी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी थेट जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या कक्षालगतच्या प्रतीक्षालयात मृतदेह आणून ठेवला. संबंधित वनाधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली.
शुक्ला हे रोजंदारी वनमजुरांना सेवेत नियमित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते. या मागणीसंदर्भात न्यायालयाचा निकाल संघटनेच्या बाजूने लागला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, पात्र वनमजुरांची यादी शासनाकडे पाठविण्याच्या प्रक्रियेत स्थानिक वनाधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. यामुळे नाराज झालेल्या शुक्ला यांनी यवतमाळ येथील एका लॉजमध्ये विष प्राशन करण्यापूर्वी ११ पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
या सुसाईड नोटमध्ये सामाजिक वनीकरण विभागातील महिला उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वनभवन कार्यालयातील अन्य दोन अधिकाऱ्यांविरोधात गंभीर आरोप करण्यात आल्याचा दावा त्यांच्या मुलींनी केला आहे. या प्रकरणात यवतमाळ शहर पोलिसांनी अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली नसल्याचाही आरोप करण्यात आला. अखेर सोमवारी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. आता सुसाईड नोटमधील आरोपांची चौकशी होणार का आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

