Ajay Kandewar,Wani:- राज्यातील शेतकऱ्यांचे जगणे आज संकटात आले असतानाच, त्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांवर प्रशासनाने दडपशाहीचा बडगा उगारल्याने संतापाची लाट उसळली आहे. वणी शहरात सोमवारी आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके यांच्या ताफ्याला अडवून निषेध व्यक्त करणाऱ्या शिवसैनिकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
अतिवृष्टीमुळे बळीराजा हतबल झाला आहे. शेतमालाचे नुकसान, अपुऱ्या मदतीचा विलंब आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस वाढतोय. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शेतकरी न्यायासाठी आंदोलन उभारले. मात्र, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे, हे सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेचे द्योतक असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.शासकीय विश्रामगृहाच पटांगणात शिवसैनिकांचा महासागर दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वणी तहसील कार्यालयासमोर शेकडो शिवसैनिकांनी न्यायहक्कांची हाक दिली. ‘शेतकरी वाचवा, अन्नदात्याला न्याय द्या’ या घोषणांनी शहर दणाणून गेले. मात्र, आंदोलनानंतर प्रशासनाने १३ शिवसैनिकांवर अजामीनपात्र गुन्हे नोंदवून त्यांना कोठडीत डांबले, ही घटना संतापजनक असल्याचे आमदार संजय देरकर यांनी स्पष्टपणे सांगितले.
“शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणं जर गुन्हा असेल, तर हे सरकार लोकशाही नव्हे तर हुकूमशाही चालवतंय!” — असं आमदार देरकर म्हणाले. त्यांनी पुढे चेतावणी दिली की, “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. हा लढा गावोगावी, जिल्होजिल्ह्यात पेटेल.” खासदार संजय देशमुख आणि जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनीही प्रशासनाच्या कारवाईवर संताप व्यक्त करत म्हटले की, “राज्यभरात शेतकऱ्यांवर अन्याय चालू आहे. पण हा वणवा आता केवळ वणीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पेटणार आहे.”निसर्गाच्या कोपाने त्रस्त झालेला शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. शेतमालाचे दर घसरले, पीक विम्याचे पैसे थकले, तर सरकारी दौरे केवळ फोटोपुरतेच मर्यादित राहिले. मंत्री उईके यांच्या ताफ्याला अडवून निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांना गुन्ह्यात अडकवणे, हे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या वेदनेवर मीठ चोळल्यासारखेच असल्याची भावना जनतेत आहे.शेतकऱ्यांचा आवाज दडपणारं हे सरकार .जनता माफ करणार नाही. शेतकऱ्यांसाठी उभ्या राहणाऱ्यांना तुरुंगात डांबणारे हे सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.