Ajay kandewar,Wani:- शहरातील वाढती वाहतूक, चौकाचौकात सुसाट वेगाने धावणारी दुचाकी व ऑटो, आणि त्यातून निर्माण होणारे अपघाताचे सावट… वणीकरांच्या डोक्यावर ही समस्या काही नवीन नाही. मात्र प्रशासनाची दृष्टी या गंभीर विषयाकडे अद्याप वळलेली नाही. अखेर मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वात शहरातील चौकाचौकात गतीरोधक बसविण्याची ठाम मागणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

•रस्ते सुरक्षित की धोकादायक?
नगरातील मुख्य रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ शेकडो वाहने धावतात. व्यापारी वर्दळ, शाळा-काॅलेजकामी जाणारे विद्यार्थी, पायी चालणारे नागरिक यांच्या जीवाशी सतत खेळ सुरू आहे. काही वाहनचालकांची बेफिकिरी एवढ्या टोकाला पोहोचली आहे की अपघाताची शक्यता क्षणाक्षणाला वाढते आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की – नागरिकांचा जीव हा प्रशासनासाठी महत्त्वाचा की मग केवळ विकासाच्या नावाखालील डांबरीकरण व टेंडरबाजी?
•निवेदनातून ठोस इशारा
राज्याध्यक्ष धावंजेवार यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, चौकाचौकात गतीरोधक बसविले नाहीत तर अपघात टाळता येणार नाहीत. “अपघात झाल्यावर प्रशासन धावपळ करते, पण आधीच खबरदारी का घेतली जात नाही?” असा थेट सवालही यात उपस्थित करण्यात आला आहे. निवेदन हा केवळ औपचारिक प्रकार न ठरता, त्यातून तात्काळ कृती घडून यायला हवी. चौकाचौकात गतीरोधक बसविणे ही ‘गरज’ नाही तर जनतेचा मूलभूत हक्क आहे.निवेदन देताना संदिप बेसरकर, सुमित्रा गोडे, सुरेंद्र निब्रड, अजय चन्ने, मनोज चौधरी, सुरेश बन्सोड, संजय चिंचोळकर व राकेश दिकुंडवार आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

